
कर्जत तालुक्यातील दुधोडी भागातील अनेक शेतकऱ्यांचे भुईमूग, मिरची, चवळी, वांगी, केळी आणि जनावरांसाठीचा घास या पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ही पिके काढणीस आली असतानाच पावसामुळे ती सडून गेली आहेत.

तरीही महसूल विभागाचा एकही अधिकारी अद्याप पाहणीस आलेला नाही. अनेक वेळा फोन करूनही कोणी दखल घेतलेली नाही. उलट, आम्ही कृषी सहाय्यक भरत भोईटे यांना मागील आठवड्यापासून सातत्याने फोन करत आहोत. त्यांच्यासोबत वॉट्सअॅपवर भुईमूग व इतर पिकांचे नुकसानग्रस्त क्षेत्राचे फोटोही पाठवले होते. मात्र, त्यांनी सांगितले की पिकांचे क्षेत्र हिरवे दिसत आहे, त्यामुळे पंचनामे होणार नाहीत.

या उत्तरामुळे आम्हा शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. आम्हाला न्याय हवा आहे. अन्यथा, जळालेली व सडलेली पिके उपटून महसूल अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर टाकून निदर्शने करू.
आम्ही आमदार रोहितदादा पवार यांना फोन करून सांगितले होते आमचे पंचनामे अद्याप झाले नाहीत. रोहितदादा यांनी लगेच महसूल व तहसिल यांना सांगितले. तरीही अद्याप पंचनामे झालेले नाहीत.
आमची मागणी आहे की पुढील दोन दिवसात पंचनामे झालेच पाहिजेत, अन्यथा आम्ही आंदोलनात्मक स्वरूपात पुढील पावले उचलू, असा इशारा बाळासाहेब कोऱ्हाळे यांनी दिला आहे.