
पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे. पर्यावरण वाचले तरच आपण वाचू – ही एक खूणगाठ आज प्रत्येकाने मनाशी बांधणे गरजेचे आहे. पर्यावरण वाचवण्यासाठी या विषयाची जाणीव मनामध्ये असणे अत्यावश्यक आहे. हीच जाणीव लक्षात घेऊन काही पर्यावरणप्रेमी आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण खास करण्यासाठी आगळावेगळा प्रयत्न करतात.

असाच एक वेगळा उपक्रम कर्जत येथे पाहायला मिळाला. येथे कार्यरत असलेल्या सर्व सामाजिक संघटनांचे जुने श्रमप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी सदस्य, युवक क्रांती दलाच्या कार्यकर्त्या शितल कारंडे आणि युवक क्रांती दलाचे सक्रिय कार्यकर्ते ॲड. शरद होले यांनी आपल्या विवाहाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी त्या संघटनांना ३० वटवृक्षांची रोपे भेट देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

शितल कारंडे काही काळ सर्व सामाजिक संघटनांमध्ये पर्यावरणप्रेमी म्हणून कार्यरत होत्या. कोविडच्या कठीण आणि भयावह परिस्थितीत त्यांनी गायकरवाडी येथील कोविड सेंटरमध्ये जाऊन झुंबा डान्सच्या माध्यमातून अनेक कोविड रुग्णांची भीती कमी करण्याचे मोलाचे कार्य केले. त्यानंतर पत्रकारितेच्या अभ्यासासाठी त्या परगावी गेल्यामुळे सामाजिक कार्यापासून थोड्या दूर झाल्या होत्या. तरीही पर्यावरणाविषयी मनामध्ये असलेली जाणीव विसरल्या नाहीत.
आपल्या विवाहप्रसंगी त्यांनी ३० वडांची रोपे देऊन हा प्रसंग पर्यावरणपूरक करण्याचा प्रयत्न केला. या युवक-युवतीच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.