
अक्षयतृतीयेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात बालविवाह होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने विशेष सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली असून, कुठेही बालविवाह होऊ नयेत यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.


अक्षयतृतीया हा सण विवाहासाठी शुभ मानला जात असल्याने या दिवशी सामूहिक तसेच एकल विवाह सोहळ्यांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केले जाते. या पार्श्वभूमीवर बालविवाह होण्याची शक्यता लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ नुसार मुलांचे किमान वय २१ वर्षे, तर मुलींचे किमान वय १८ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. या वयोमर्यादेपेक्षा कमी वयात विवाह केल्यास तो बालविवाह ठरून बेकायदेशीर मानला जातो. अशा प्रकरणांमध्ये संबंधित पालक, नातेवाईक, आयोजक तसेच विवाह सोहळ्यात सहभागी असलेल्या सर्व संबंधितांवर गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या गुन्ह्यासाठी दंड व कारावासाची तरतूद आहे.
शासनाच्या अधिसूचनेनुसार ग्रामीण भागात ग्रामसेवकांची बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून अंगणवाडी सेविका सहाय्यक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शहरी भागात बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) यांना प्रतिबंध अधिकारी, तर मुख्यसेविकांना सहाय्यक अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
बालविवाह रोखण्यासाठी मंदिरे, मशिदी, चर्च, गुरुद्वारे, मंगल कार्यालये, बँडपथके, डीजे, केटरर्स, फोटोग्राफर तसेच विवाह विधी करणारे धर्मगुरूंनी बालविवाहास कोणत्याही प्रकारे सहकार्य करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित यंत्रणांनी अशा ठिकाणी विशेष लक्ष ठेवून आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
अक्षयतृतीया तसेच वर्षभर कुठेही बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ चाइल्ड हेल्पलाईन १०९८ किंवा पोलीस हेल्पलाईन ११२ या टोल-फ्री क्रमांकावर कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अहिल्यानगर जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहकार्य करावे, असेही जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी नमूद केले.

